दृष्टिकोन
दिवस मावळतीला आला.... दिवसभर काम करून सदानंद थकून गेला होता.. आता घरी जायचं आणि बायकोच्या हातचं पिठलं भाकर खायची ही एकच इच्छा त्याच्या मनात होती. दिवसभर कष्ट करणे आणि सुखाची भाकर संध्याकाळी खाणे हा त्याचा नीतिनियम होता.. सकाळी लवकर उठणे जनावरांचे शेण शेणकुर करून त्यांच्या खालची घाण साफ करायला त्याला मजा यायची..शेणकुर करून झाल्यानंतर दोन गाई , वासरू आणि आपल्या लाडक्या हौश्या आणि नंद्याला वैरण टाकून तो आंघोळीला बसायचा.. आंघोळीला बसण्यापूर्वी हलकेच दोन गाईंचे दूध काढून ठेवण्याच्या कामांमध्ये मंगा त्याला मदत करायची... आंघोळ झाल्यावरती देवाची पूजा करणे आणि सायकलवर टांग मारून डेअरीला विक्रीसाठी दूध घेऊन येणे... दुधाला इतकी फॅट लागली म्हणजे इतका भाव मिळेल... हे गणितही कधीकधी तो जुळवत बसत असे...पण आनंदी असणे आणि त्या क्षणांचा आनंद घेणे हे सदानंद न चुकता करत असे... कोणत्याही प्रकारचा खोटा गाजावाजा न करता हे काम करायला त्याला मजा यायची.. दूध घालून आल्यावर घरी येणे परत जनावरांना चारा टाकणे आणि कामाला परत लागणं... शेतीच उरलेल प्रत्येक काम मग ते कोणतही असो करताना त्याच्या चेहऱ्यावर फक्त काम क...